शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

 

"He is wise like an angel
and adamant like a devil"
ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी
असे वर्णन करतात हिवाळ्याचे !
यंदा तर कहर झाला होता थंडीचा !
मराठवाडा कधी नाही ते एवढा काकडला !
**
सरती थंडी.. सरत्या आठवणी !
उबदार शालीत सांभाळलेल्या आठवणी-क्षण
आता थंडी ओसरताना, शाल बाजूला करताना..
या क्षणांना मिळालेल्या कोवळ्या उन्हांनी
एक प्रसन्नता बहाल केलीय.
**
गुलमर्ग .. टूर नेला आणि श्रीनगर करून
इथे आलो.. वाह... गेली दोन दिवस बर्फ पडलेला..
कॉटेज भवती तर बर्फाचं साम्राज्य,
आणि तो मुक्काम !
न विसरता येणारी थंडी, हिटरही किती काम करणार?
रजया तरी किती म्हणून मागवणार ?
रात्रीच्या जेवणानंतर दोनदा कॉफी झाली तरी
फरक नाही.. कसा बसा झोपलो
पहाटे चारला जाग आली आणि
खिडकीच्या तावदानावर आवाज ऐकू येऊ लागले,
बाहेर बर्फ पडत होता...
थंडी ला "कडाक्याची" म्हणणे सुद्धा कमी वाटावे
असा तो गारठा .. त्या पहाटे रूम केट्ल कितीदा
गरम केली आणि किती चहा झाला याची मोजदाद नाही.
ही देखील एक आठवण असू शकते.
**
दिवाळीच्या काळातील आजोळी अनुभवलेली
थंडी आठवणींच्या शालीत एक ऊब देणारी,
न्हाणी घर म्हणजे फक्त भिंती आणि वर आभाळ,
गंगाळातील चटका देणारं पाणीही कोमट
वाटणाऱ्या थंडीतील पहाटे चार-पाच वाजताचं अभ्यंगस्नान
आणि नंतरची हुडहुडी मजेदार असायची.
**
साताऱ्याला नवीन राहायला घरात आलो,
नोव्हेंबर महिना आणि येणे अपरिहार्य होते.
खिडक्यांना काचा लावायच्या राहिलेल्या,
मोठ्ठ्या खिडक्या कशाला केल्या असतील बरं ?
हा प्रश्न त्रयस्तासारखा आम्हीच एकमेकांना विचारला .
एक तर त्यावेळी त्या भागातील हे एकमेव घर,
त्यामुळे पूर्ण मोकळा परिसर , थंडीचा जोर अधिक!
लोखंडी टोपल्यात शेकोटी पेटवली..
नुसत्या जाळाकडे बघूनही ऊब !
त्यानंतर कितीतरी वर्ष प्रत्येक थंडीला
टोपलं, लाकडं -कोळसा आणि
नंतर घरभर धूर ठरलेला.
घरातली ही थंडी डोळ्यात पाणी आणणारी !
**
गंगोत्री परिसरात कॅम्पिंग करताना रोज पहाटेच उठावं लागायचं
कारण कॅम्प किचनची जबाबदारी (जेवण बनवायला कुक सोबत होते, पण कमी जास्त पडणारे साहित्य आणि सकाळीच ट्रेक सुरु होण्यापूर्वी मार्केटचा राउंड ठरलेला. यामुळे पाच साडेपाचला दिवस सुरु व्हायचा ) जून असला तरी तिकडे थंडी भयंकरच. तशात भल्या पहाटे उठून टेन्ट मधून बाहेर येणं जीवावर यायचं.. पण बाहेर आल्यावरचा माहौल आणि एक मोठ्ठा मग भरून समोर येणारा चहा.. आहाहा..!
अजूनही त्या दिवसातील सूर्योदयापूर्वीची बोचरी थन्डी आणि चहाच्या वाफा.. भुला नही अभी भी.
**
**
आपल्याकडे थंडी आली की, घरातील ज्येष्ठांना एक वेगळाच उत्साह असतो ! कशाचा ?
लाडू वगैरे ठीक आहे, पण घरात सगळ्यांनी स्वेटर, बाहेर पडताना मफलर घातले की नाही,
यासोबतच "कानाला काही बांधून जा!" ही प्रेमळ सूचना आणि ..
अनेक घरात बघत असतो..
देवळात जसं उत्सवांप्रसंगी गाभाऱ्यातील देवाला सजवलं जातं, नटवलं जातं.
घरी कृष्णाष्टमी, महालक्ष्मी आणि गणपतीत जशी दृश्ये दिसतात.
तसंच आमच्याकडे थंडीच्या दिवसांत आणखी एक दृश्य असतं.
तसं ते अनेकांकडेही असेलच म्हणा !
घरात गुरूंचे एक लाकडी कटआऊट आहे,
दर वर्षी थंडी आली की, आई त्या कटआऊटला
शाल पांघरते, कधी डोक्याला उपरणं बांधते तर कधी कानटोपीही घालते.
माहिती असते की ते लाकडी कटआऊट आहे,
माहिती असतं की, देव दगडाचा आहे..
पण तरी एखाद्या माणसासाठी,
घरातील चालत्या बोलत्या व्यक्तीसाठी , प्राण्यांसाठी
केली जाणारी कृती जेव्हा मूर्तीसाठी केली जाते
तेव्हा चकित व्हायला होतं.
थंडीत डोक्याला-कानाला काही बांधून जा
म्हणणारी ज्येष्ठ पिढी .
सश्रद्ध भावनेतून थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून
मूर्तीलाही कानटोपी-शाल, उपरणं पांघरणारी
ही मंडळी बघितली की,
पटतं बाहेर कितीही थंडी असली तरी
आपल्याकडे संस्कारांचा गाभारा मात्र ऊबदार आहे !

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

दुभंगणारा प्रवाह - ओंजळीतील ओहोळ



एके दिवशी सकाळीच शेजारी घरी आले,
"अरे ! सुबह सुबह कैसे ?"
"बच्चे की शादी है.. आपका मनू कहां है ? "
'है .. ' म्हणत मी चिरंजीवाला आवाज दिला,
तो येताच याने त्याच्या हाती बॅग दिली..
" ड्रेस का कपडा है, शादी के पहले सिलाना
और दावत मे पहनके आना!"
असं मुलाला दटावत नमस्कार करून तो निघून गेला..
मग आपल्या रितीरिवाजाप्रमाणे
त्यांना सहकुटुंब बोलावून आहेर झाला..
ही देवाण घेवाण सुरु असते..
**
आणखी आमचे एक अजीज मित्र, समोरच राहतात,
ते न चुकता रमजान मध्ये खास बोलावतात,
इकडून दिवाळी फराळ जातो.
काही वर्षांपूर्वी आई आजारी होती,
नियमित फळफळावळ, सोबत ख्याली खुशालीचा
संदेश मिळत राहिला.
मी गावी गेलो की, आवर्जून त्यांच्या मुलांपैकी
कुणीतरी घरी चौकशी करून जातं ..
काही अडचण आहे का विचारतं !
**
सात -आठ वर्ष आमच्याकडे एक चाचा गाडीवर होते,
बालवाडीत असलेल्या माझ्या मुलाला कधी ते एकटेच
जाऊन आणत .. घरात कुणीच कधी काळजी केली नाही.
माझं लहानपण जाफरगेट भागात गेलेलं,
तिथे कधी बानूची आई भेटली तर कधी कुणी,
शाळेत एक मित्र होता, त्याला कॉमिक्सची खूप आवड खिजर नाव बहुदा. मला तेव्हा ते अप्रूप होतं, एवढे कॉमिक्स घेणे परवडत नव्हते, मग तो आग्रहानं मला घरी घेऊन जायचा आणि बाइंडिंग केलेले कॉमिक्सचे गठ्ठे वाचायला द्यायचा.. एक शिरीन होती, एकत्र डब्बा खात असू. हे दोन्ही मित्र पाचवीच्या आधीचे.
**
हे आज का आठवावं ?
दुभंगत जाणाऱ्या प्रवाहाची चिंता करावी,
की या छोट्या ओहोळांना ओंजळीत धरावं ?
काळजी आणि काळीज एक वेलांटीचा फरक !
पण बेबंध झालं की दोन्हीचा ठोका चुकतो.
आज समाज काय विकतोय ?
कोण खरेदी करतोय .. कोण बोली लावतोय..
आकलनापलीकडे जातोय आपण !

रविवार, ३० जानेवारी, २०२२

रिक्षावाला शिताफीनं वळवतोय हँडल !

रिक्षावाला शिताफीनं वळवतोय 
आयुष्याचं हँडल !



रिक्षा चालवतानाच तो आपली कथा- व्यथा सांगत होता. जिद्दीचा तो प्रवास..रामनगर भागात राहणा-या रिक्षावाल्याला आपल्या आयुष्यात राम सापडला-अर्थ सापडला. स्वार्थ बाजूला सारत त्याने ' कर्म' केले त्याची कहाणी!

***

मागच्या आठवड्यात आम्ही एक वेगळीच गंमत केली,

बहिणीकडे जायचं होतं...गाडी चालवणं जीवावर आलं होतं.

जाणं भाग. ...ठरवलं आज रिक्षाने जाऊया.

मी खूप दिवसात रिक्षाने शहरातून प्रवास केला नव्हता, आज करावा म्हटलं. मग सहकुटूंब रिक्षा प्रवास झाला. जाताना आणि येताना. गाडी असूनही रिक्षाने आलो याचे बहिणीलाही नवल वाटलेपण आमचे स्वभाव बघता आम्ही अशा गंमती जमती आणि ऑड गोष्टी करणार हे तिनेही गृहीत धरल्याने यावर फार चर्चा झाली नाही.

परतीला आम्ही जालना रोडवर आलो, एक रिकामी रिक्षा दिसली ..हात केला , तो थांबला. तसे आम्ही साता-यात येणार का म्हणताच त्याने मान हलवत खूण केली. आत बसलो तिघेही.

रिक्षा स्वच्छ आणि चालकही गणवेशात. आतमध्ये लायसन्स फोटोसह लटकवलेले..नाव फोन नंबरसह.

**

नाव तर कळलं होतं. साता-याला जायला पंधरा-वीस मिनिटं लागणार होती. संवादाला सुरूवात झाली.

हळू हळू तो खुलत गेला..आणि एका जिद्दीचा

हरता आयुष्याला भिडलेल्या,

आपल्या नव्या पिढीसाठी

मोठं स्वप्न डोळ्यात घेऊन

रोजचा दिवस साजरा करणा-या

माणसाचा परिचय झाला !

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवताना

तेवढाच कुल राहणारा रिक्षावाला कळला.

सामान्यांत असलेली ऊर्जा जाणवली.

सहा बहिण भावंडांपैकी हा एक, जालना जिल्ह्यातील एका खेड्यांतून आलेला. वडील कुठेसे नोकरीला होते, याचे शिक्षण अर्धवट राहिले, मग चिकलठाण्यातील एका कंपनीत काही वर्ष नोकरी केली. भावांना मात्र तो शिकण्यासाठी मदत करू लागला. स्वतःच्या शिक्षणावर पाणी सोडून...

नोकरी पटेना म्हणून मग एकाची रिक्षा भाड्याने चालवायला सुरूवात केली...शाळेची मुलं दोन शिफ्टमध्ये..आणि असं करता करता तीन वर्षापूर्वी त्याने स्वतःची रिक्षा घेतली..एक छोटासा प्लाॅट घेऊन दोन खोल्यांचं घर बांधलं..दरम्यान बहिणींची लग्न

भावांचे शिक्षण आणि याचा संसार सगळीच कसरत!

आज दोन लहान मुलं.

"मुलगा नववीला गेलाय, मुलगी बारावीला. तिला शिकवतोय..पी.आय. करायचंय..पोलिसात जाणार!" हे सांगताना तो जेव्हा मागे वळून माझ्याकडे बघत होता . तेव्हा त्याच्या डोळ्यात एकाचवेळी कृतार्थता, चमक आणि स्वप्नं मला दिसली.

समाधानाने तो सांगत होता..

तरी एक खंत बोलण्यात होती,

मला स्वतःसाठी काही करता आलं नाही.

भावाला पस्तीस हजार पगाराची नोकरी आहे, त्याचा मुलगा शिकून पुढे पुण्यात आयटी करतोय..

भावाने आता मोठा प्लाॅटही घेतलाय.

मी अजून रिक्षा चालवतोय..

दैवाला दोष देता, आयुष्याचं हँडल शिताफीने वळवत येणारे प्रत्येक सिग्नल पाळतोय..

अॅक्सलेटरवरचा हात कायम आहे.

संधी येईल..यावी..वेगासाठी.

लढ मित्रा!

तू चांगलं केलंस ..चांगलंच होईल.



शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

दिवाळीतील दिवे लागण !

 दिवाळीतील दिवे लागण !















दिवाळी गुंजेला,
माझ्या आजोळीच होत असे,
पुसद जवळचे हे छोटेसे गाव.
गढी आणि तिथले चार वाडे.
लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला आजी-मामी संध्याकाळी दिवे लावत.

तीन मोठ्या परातीमध्ये सगळ्या पणत्या ..

पेटवत एक एक पणती ठराविक ठिकाणी ठेऊन यायची.

कधी आम्हीही हे काम हौसेनं करायचो. पण नेमकी कुठली तरी जागा राहून जायची
पणती ठेवणं विसरून जायचं.

पणत्या लावून आलो की ! विचारायची .. उंबरापाशी लावली? हौदाजवळ? विहिरीपाशी ?
हो हो म्हणताना एखादं ठिकाण राहून जायचं ..
पुन्हा तिथे जाऊन पणती ठेवून यायची .. जवळपास पन्नास एक दिवे लागायचे
गढीच्या प्रवेशापाशी असलेल्या चांद खान महाराज पीरापासून ते
बाजूस असलेल्या उकिरड्या पर्यंत.
वेगळी गंमत ..

गढीही तशी उरली नाही,

आजी गेली, मामा देखील कितीतरी वर्षांपूर्वी पुसदला स्थायिक झाला,
दिवाळी विरली ती कायमची. मात्र तसे दिवे-पणत्या लावण्याचा परिपाठ अजूनही आहे.
तो इथे औरंगाबादला.. आता आई विचारते ..
जवळ लावला? बेलापाशी ? गच्चीचे दार .. आणि आवळी जवळ?
एक तरी जागा राहतेच जिथे विसरायला होतं !
अर्थाने दिव्यांचा सण होतो..
पाच पणत्या लावाव्या ना !
... घरातल्या मोठ्यांना कोण सांगणार !
ते वास्तुपुरुषाची जागा
अंगणातील मुख्य दार ते मागच्या
सदृश जागेचे दार ..
दिवे पेटले पाहिजे...
उजेड दिसला पाहिजे.
समाधान... समाधान कशाचं... ?
? खूप पणत्या लावल्याचं ?
(!) -परंपरा जतनाचं, की ...
समाधान असतं नक्की !
दिवाळीचा शेवटचा दिवस
आठवण घेऊन आला.

***

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

 प्रश्न सावडतो आहे...

(काव्य नाही प्रश्नांची लगोरी)

चिंता.. आता जगणार कसा याची,

की चिंता मरणार कसा याची?

छताला भिंतींनी सावरून धरलंय

की, छतानेच दिलाय आधार भिंतीना ?

‘समजुतीच्या आधारे’ जगणारे खूप झाले,

पण त्यांची ‘समजूत’ काढणारे कुणी नाहीच का ?

देणारे असतात तर घेणारेही असणारच,

पण इथे फक्त घेणारे असले तर देणारे कोण?

घरातली माणसं खरंच जवळ आली

की, ही फक्त ‘सोय’ काही काळाची?

चिमणीला दाणे टाकणारे हात नेहमीचे

की, कुणी पारधी फेकतोय मजबूत जाळे ?

माणसातल्या ‘माणसाची’ ओळख पटतेय

की, माणसा माणसात दुही जास्त पेटतेय?  

समाजाची दरी सांधणारी ही अवस्था आहे

की, दरी वाढवणार ही व्यथा म्हणायची ?

संकटे येताना एकटे येत नाही म्हणे

पण जाताना ते कसे जाते कुणास ठाऊक ?

मागून मिळाल्या दानाला म्हणायचं कृपा !

की कृपा म्हणजे न मागता मिळालेले मुठभर धान्य ?

कोण वार करतोय कोण करतोय प्रतिकार,

आता आधार दिला जातोय का उधार ?

मान्य की प्रश्नांची गर्दी खूप झाली..

त्यांचे सोशल distancing करेनही

पण उत्तरांची लस पाहिजे..

प्रश्न “अं त र” ठेवल्याने संपणार नाहीत..

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

CIVIC VIRTUE च्या शोधात!

CIVIC VIRTUE च्या शोधात!



सोशल मिडियातून विष पेरलं जातंय विष...अनेकजण तर ठेका घेतल्याप्रमाणे पोस्टचा रतीब घालतात. अतिरेकी वापरला जाणारा हा मिडिया आणि यातून झिरपत जाणारे उथळ विचार, सरते शेवटी आपल्याला कुठे नेणार या विचाराने डोकं भन्न होऊन जातं. तुमचं ही होत असेल पण तुम्ही दुसऱ्याच  क्षणी ते झुकागारून स्वत:ला कुठेतरी किंवा  अन्य विचारात गुंतवून घेताय. उथळ अविवेकी विचारसरणी, उतावीळ पणे व्यक्त होणारी माणसं, संयमी वृत्तीचा लोप..हे इतकं व्यापलंय आणि अशांचा समूह म्हणजेच तर समाज..! समाज आता या दिशेने प्रवाहित झालाय..तुम्ही प्रयत्न करा तो थांबणार नाही. त्याला तमा नाही, तो फक्त आणि फक्त स्वत:ची चांगली –वाईट मतं समोरच्यावर थोपवू पाहतोय. यातून त्याला मिळणार आहे एक आनंद व्यक्त होण्याचा आणि उन्माद - वर्चस्वाचा !

याचा उद्रेक होत होत एकवेळ अशी येणार की या दुहीतून सगळाच समाज विखुरला जाईल. ठिपक्यांची रांगोळी बिघडते ..रेषा सरळ येत नाहीत कारण ठिपके देतांना-टाकताना ते सरळ-सलग नसतात..तेच होऊ बघतंय..समाज म्हणून सगळीकडे बिघडलेली ठिपक्यांची रांगोळी दिसतेय. भले तुम्ही वर्तमान स्थिती क्षणिक आहे म्हणा, पण ही पेरणी आहे, वरतून कितीही अलबेल वाटलं तरी खदखद रुजतेय..कधीतरी हा ज्वालामुखी जागृत होईल. त्यावेळी ? हा प्रश्न मनात वादळ निर्माण करत असताना एक शब्द प्रखरतेने समोर येत होता आणि त्यानिमित्ताने व्यक्त व्हावं वाटलं.

CIVIC VIRTUE हा शब्द-याचा अर्थ अनेक वर्षांपासून डोक्यात घोळतोय.तो आज तुमच्याही समोर ठेवावा वाटला, “सिव्हिक व्हर्च्यु” – समाजाच्या यशस्वी वाटचालीसाठी चंगल्या सवयी-रितींची पेरणी, ही संकल्पना सिटीझनशिप अर्थात नागरिकत्वाशी संलग्न आहे, जुळलेली आहे. “सिव्हिक व्हर्च्यु” समाजाच्या सार्वत्रिक कल्याणासाठी-भल्यासाठी  नागरिकाचे डेडीकेशन.. Civic virtue is the harvesting of habits important for the success of the community.

नागरिकाची - प्रसंगी वैयक्तिक मतं बाजूला ठेवत समाजहित बघून होणारी कृती-वर्तणूक-अभिव्यक्ती ! राजकीय फिलोसोफीच्या कोनातून विचार केला तर “सिव्हिक व्हर्च्यु” म्हणजे नागरी आणि राजकीय व्यवस्था कार्यप्रवण-सुरळीत राहावी यासाठीच्या सदगुणांचा वापर!  (राष्ट्र, राज्य, शहर इ. या क्रमाने) समाज उन्नतीच्या कार्यात सक्रीय सहभागी होणं. किमान आवश्यक अशा कृतीमध्ये सहभाग नोंदवणे (हा या शब्दाच्या व्याख्येत  समाविष्ट  एक पैलू ) हा सहभाग म्हणजे मग नियमित कर भरणाही असू शकतो, वाहतुकीचे नियम पाळणे किंवा आज कोरोनाच्या निमित्ताने मा. पंतप्रधानांच्या आवाहनाला मिळणारा पाठींबा देखील असू शकतो.  ही एकाने करण्याची कृती नाही... तर अशा अनेकांचा मिळून जो समूह निर्माण होत जातो ते म्हणजे सामाजिक सहकार्य..civic virtue ! याची पेरणी समाजात होणे गरजेचे आहे...ती झाली तर सुदृढ –सकारात्मक समाजाची निर्मिती होईल. यासाठी न्यायाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच प्रामाणिकवृत्तीला देखील. आजच्या परिस्थितीत घडणे अशक्य वाटत असले तरी अगदीच असंभव नाही ..त्यादृष्टीने कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांनी ती साध्य होईल. पण मुळात नागरी समूह सुजाण होणे अभिप्रेत आहे.

सुरुवात झाली नाही का ? तर झालीय ..पण हे सगळे वैयक्तिक पातळीवर, या म्हणजे जे समाजहिताचे काम करतात, सामाजिक सौहार्द राखण्यासाठी पुढे येत असतात, अशांची ऐक्य प्रक्रिया घडणे गरजेचे आहे..अशांनी कुठेतरी संवादातून-संपर्कातून एक होत राहणे गरजेचे आहे, जेव्हा ही संख्या तुलनेने वाढीस लागेल, एक लक्षणीय स्थितीत येईल तेव्हा “सिव्हिक व्हर्च्यु” संकल्पना साकारली जाईल जी आज व्यक्तिगत पातळीवर आहे ..म्हणून ती नाही असे जाणवू शकते.

थोडक्यात नागरिकांची समाजातील involvement – सहभाग आणि हा देताना नैतिक मुल्यांची जपणूक , ही संकल्पना नागरिकांना त्यांच्या समाजाशी बांधून ठेवणारी आणि त्यांना आपसातील जबाबदारी समजावून सांगणारी. समज निर्माण होताना समाजाच्या भल्यासाठी सगळ्या भल्या विचारांच्या माणसांनी एक होण्याचा निश्चय करत वाटचाल सुरु होणे म्हणजे “सिव्हिक व्हर्च्यु” ची संकल्पना रुजणे..ही आज काळाची गरज आहे.  (यात अभ्यासक आणखी मुद्दे जोडू शकतील. पण कुठेतरी या विचारांना सुरुवात व्हावी . ही संकल्पना नेमकी समोर यावी यादृष्टीने मी ब्लॉगवर टाकले आहे. )

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

Ctrl+S : Its a grt idea!

Podcast link below

https://open.spotify.com/episode/0mFvxesEiWWn6DJ3vZPrgF?si=iCAtq3hHSm-fqqrFxNAKAA           

         धीकाळी आपल्याला छोट्या-मोठ्या शहरात टायपिंग इन्स्टिट्यूट दिसत. नव्वदीच्या दशकापर्यंत सुरु होत्या, दरम्यान आपल्याकडे संगणक युग विस्तारले, टायपिंग इन्स्टिट्यूट मागे पडत गेल्या. इथे टाईप होणारा कागद जपून ठेवावा लागे, कारण त्या यंत्रात सेव्ह करण्याची सोय नव्हती. नव्वदच्या सुमारास मी तरुण भारतमध्ये दाखल झालो तेव्हा डीटीपी सेक्शनला असलेल्या संगणकावर शिकण्याची संधी मिळाली, त्यावेळी अबॅकसचे आणि इतर संगणक होते, किंमत साडेतीन लाख आणि वरच. संगणकाला मेमरीची तशी सोय नव्हती जी आता आहे, फ्लॉपी असायच्या ३६० केबीच्या. आधी संगणकात कंपोज करायचे, मग फ्लॉपी टाकून बूट करायचे, दुसरी फ्लॉपी टाकून सेव्ह करून घ्यायचे...अर्रर इतकं क्लिष्ट होतं ते ! (अर्थात आता ते वाटतंय, तेव्हा नाही) 

             हे लिहिता लिहिता सहज आठवलं, चंद्रावर उतरलेलं पाहिलं अपोलो स्पेसक्राफ्ट होतं ना, त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्टोरेज क्षमता होती ६४ केबी. त्याच काळात २० एमबी पर्यंतची हार्डडिस्क आली. मग पुढे सगळं वाढत गेलं..आता तर विचारायलाच नको. शिवाय कीबोर्डवर ज्या दोन keys हाती आल्या, त्यांनी जुनं सगळं वाचता, बघता येतंय. Ctrl आणि S ! मेमरी मध्ये साठवण्याची सोय ही मला वाटतं जगातील सर्वोत्तम सुविधा आहे. यामुळेच मेमरी जेवढी जास्त तेवढा आनंद अधिक आणि त्याचा उपयोगही जास्त. जगताना माणसाच्या मेमरीत काय काय साठवलं जातं नाही ? फक्त कोणती फाईल कोणतं फोल्डर कुठे आहे, ते कधी उघडावं आणि त्याचा उपयोग कसा करावा हे मात्र रॅमवर अवलंबून आहे तसंच  ते प्रोग्रामिंगवरसुद्धा डिपेंड आहे. आपला मेंदूची क्षमता सुमारे २.५ पेटाबाईट, अगदीच सोपं करून सांगायचं तर १६ जीबी ची मेमरी असलेले दीड लाखापेक्षा जास्त फोन. (१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट आणि १ टेराबाईट -१००० जीबी)  बघा ! कुठल्या कुठं जातोय विषय. टायपिंग   इन्स्टिट्यूट ते चंद्रावरचे यान आणि थेट तुमची-माझी मेमरी.

            या मेमरीतील काही घटना, प्रसंग, विचार मांडण्यासाठी हा ब्लॉग. आज संगणकाच्या मेमरीत काही सेव्ह करायचं तर काम करताना न चुकता Ctrl+S करावं लागतं, असं आपलं-आपल्या मेंदूचं होत असेलच की, आपल्याच नकळत Ctrl+S दबत असणार आणि अनेक बाबी सेव्ह होतच असणार. या सेव्ह केलेल्या गोष्टी पुन्हा स्क्रीनवर आणतोय.

            कंट्रोल + एस महत्त्वाचं! या दोन keys म्हणजे आपल्याही जगण्याचं एक तंत्र. गरज असलेलं साठवायचं, साठवलेलं आठवायचं, आठवलेलं पाठवायचं किंवा चेक सारखं वठवायचं. आपला मेंदू तर संगणकाच्या कितीतरी पुढे आहे, कारण इथे संगणकाच्या सगळ्या keys सोबत आणखी एक कीआहे ती भले बोर्डवर इतर keys सारखी सामान्य दिसत असली तरी प्रोग्रामिंग होताना तिचे functioning अफलातून आहे. ‘E’- emotions ! या मुळे आयुष्यातील कंट्रोल + एस ला एक गंमत आहे, एक रंगत आहे. कल्लोळ आहे. आपसूक कळ न दाबता मेंदूचं हे function सुरु होतं. कधी तरी  Ctrl+S केलेलं चटकन समोर येतं हे कुठे तरी forward होतं. चेहऱ्यावर, कृतीतून, विचारातून आणि शब्दातून!

            हे होताना असतो एक संदर्भ भूतकाळात घडलेल्या घटनांचा, एक धागा वर्तमानातला. कधी अस्वस्थ करणारा तर कधी आश्वस्त करणारा. शोध स्वत:चा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेत अशा Ctrl+S केलेल्या गोष्टी आपलं स्वत:चं स्थान बाळगून असतात. 

            आज घडीला forward असणं आणि forward करणं एवढंच महत्वाचं आहे की काय असं वाटण्याजोगा काळ आहे, forward असणं म्हणजे नेमकं काय याचा विचार आपण केलाय? सहज खाजणारं अंग जसं आपल्याच नकळत आपण खाजवतो ना, तसं नकळत सोशल मिडीयावर forward करणं होताना दिसतं. मात्र नवी जनरेशन या platform वर वावरताना अधिक समंजस वाटते, त्यांच्या आधीचे या मिडीयावर वावरतात ते अतिउत्साही आहेत असं ठामपणे म्हणावं वाटतं. पिढी बदलताना platform बदलत आहेत, व्यक्त होण्याचे अंदाजबदलत आहेत, एफबी आणि whatsapp किंवा तत्सम मेसेजिंग आउटडेटेड, इन्स्टा, tweet, स्टेज उपलब्ध आहे. जिथे शब्दांना मर्यादा आणि क्रिएटीव्हिटी अमर्याद आहे. या सगळ्या मायाजाळातून Ctrl+S चा उपद्व्याप सुरु होतोय. या नोंदी वर्तमानाच्या, या नोंदी जगताना घडून गेलेल्या भूतकाळातील प्रसंगांच्या-माणसांच्या आणि वस्तूंच्याही ! जगता जगता जपलेल्या आठवणींच्या या नोंदी, कधी काही प्रसंग तर कधी त्या घटनांच्या निमित्ताने भेटलेली माणसं. निसटलेले क्षण म्हणता येतील का ? म्हणता येतील, निसटले तरीही धरुन ठेवलेले ते क्षण, माणूस, सभोवताल न्याहाळताना दिसलेला चांगुलपणा, जाणवलेली संवेदना-वेदना आणि हो ! कधी त्या क्षणांच्या सहवासात निर्माण झालेला विचारकल्लोळ. हे सगळं Ctrl+S केलेलं इथे Ctrl+V करत, पेस्ट करत- forward करतोय जे दुसरीकडून आलेलं नाही.  

            

थंडीच्या ऊबदार गोष्टी !

  "He is wise like an angel and adamant like a devil" ग्रेस ('वाऱ्याने हलते रान') एके ठिकाणी असे वर्णन करतात हिवाळ्याचे ...